खरीप हंगामात राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. काही भागांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पीक चांगले उगवले, मात्र नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांवर ताण आला आहे. त्यामुळे कीटक आणि बुरशीजन्य रोगांचा धोका वाढलेला दिसतो. अशा परिस्थितीत रासायनिक औषधांऐवजी नैसर्गिक आणि सेंद्रिय उपाय अधिक फायदेशीर ठरतात. त्यामध्ये सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी.
निंबोळी अर्काच्या फवारणीचे फायदे
निंबोळी अर्काचा वापर केल्यास अळी, मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या कीटकांपासून पिकांचे संरक्षण करता येते. यासोबतच रोगांवरही नियंत्रण मिळवता येते. शेतकऱ्यांसाठी ही पद्धत सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणस्नेही आहे.
निंबोळी अर्क कसा तयार करावा?
निंबोळी अर्क घरीच सहज तयार करता येतो. त्यासाठी ५ किलो निंबोळी बारीक करून १० लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून घ्यावे आणि त्यात ९० लिटर स्वच्छ पाणी मिसळावे. यानंतर २०० ग्रॅम साबणाचा चुरा टाकून चांगले ढवळून घ्यावे. हे तयार १०० लिटर द्रावण एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे असते.
निंबोळी अर्काचे फायदे
निंबोळी अर्क पिकांवरील कीटकांचे जीवनचक्र बिघडवतो आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतो. त्यामुळे कीटकांची संख्या वाढत नाही. याशिवाय हा अर्क जमिनीच्या पोतामध्ये सुधारणा करतो आणि फायदेशीर सूक्ष्मजीव वाढण्यास मदत करतो. रासायनिक कीटकनाशकांपेक्षा तो अधिक स्वस्त, सुरक्षित आणि दीर्घकालीन फायदे देणारा आहे. हे सर्व फायदे एकत्रितपणे पिकांची प्रत आणि उत्पादनक्षमता वाढवतात.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
‘आत्मा’ संस्थेचे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे सांगतात की, रासायनिक औषधांचा अतिवापर जमिनीच्या गुणवत्तेला धोका पोहोचवतो. त्यामुळे निंबोळी अर्कासोबत दशपर्णी अर्क आणि तंबाखू अर्क वापरणे हे अधिक सुरक्षित आहे. दशपर्णी अर्क रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, तर तंबाखू अर्क पाने खाणाऱ्या कीटकांसाठी उपयुक्त आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले
कोवळ्या पिकांवर कीड किंवा रोग दिसताच ५% निंबोळी अर्काची तात्काळ फवारणी करावी.
फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी.
अती पाऊस किंवा दुष्काळ अशा दोन्ही स्थितींमध्ये सेंद्रिय उपाय अधिक परिणामकारक ठरतात.
शेतमित्र, कृषी सहाय्यक किंवा ‘आत्मा’ केंद्राशी सल्लामसलत करून फवारणी करावी.