सध्या महाराष्ट्रातील हवामानाबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत – पाऊस कधी येणार? कुठल्या भागात पडणार? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली असून ती शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारी आहेत. मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र आता काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना दिसतोय. त्यामुळे पुढील दोन दिवस हवामान कसे राहणार, याबाबतची माहिती डख यांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
डख यांच्या अंदाजानुसार 2 ते 3 जूनपासून काही प्रमाणात वातावरण साफ होण्यास सुरुवात होईल. खान्देश आणि विदर्भ या भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता अधिक आहे. अंदाजानुसार 80 टक्के भागांमध्ये उघडीप कायम राहील, तर उर्वरित 20 टक्के भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हे वातावरण 7 आणि 8 जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यामुळे वातावरणात जड ढग तयार होतात, पण ते प्रत्येक भागात पाऊस पाडत नाहीत. त्यामुळे अनेकांना वाटतं की सगळीकडे एकसारखा पाऊस पडतो, पण प्रत्यक्षात फक्त काही भागांमध्येच सरी बरसतात. विशेषत: सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण, पुणे, मुंबई या भागांत एक दिवसाआड ढगाळ वातावरण राहू शकतं, असं डख सांगतात.
महत्त्वाची बाब म्हणजे मान्सूनचा खरा पाऊस म्हणजे नियमित, सातत्याने पडणारा पाऊस – तो 15 जूननंतरच सक्रिय होणार आहे. या तारखेपासून प्रत्येक दिवसात अंदाजे 45 टक्के भागात मान्सून पावसाची शक्यता असेल. म्हणजे, एकाच दिवशी संपूर्ण राज्यात पाऊस सुरु होईल अशी अपेक्षा ठेवणे योग्य ठरणार नाही. प्रत्येक भागात वेळेनुसार आणि वातावरणानुसार मान्सून दाखल होतो. त्यामुळे डख यांचा स्पष्ट सल्ला आहे की, कोरडवाहू शेतकऱ्यांनी अजून पेरणी करण्याची घाई करू नये. 14 जूनपर्यंत सुमारे 80 टक्के भागांमध्ये उघडीप राहील. केवळ 20 टक्के भागांमध्ये खऱ्या अर्थाने पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे पेरणीसाठी हवामान स्थिर होईपर्यंत प्रतीक्षा करणं अत्यंत गरजेचं आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात हवामानात चढ-उतार दिसून येणं सामान्य बाब आहे. त्यामुळे हलकेसे ढगाळ वातावरण, काही भागांत सरी आणि काही भागांत पूर्ण उघडं आकाश हे चित्र कायम राहील.
गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसामुळे काही भागांत पिकांचं आणि जनजीवनाचं नुकसान झालं. विशेषत: भाजीपाला, फळबागा आणि नाजूक पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. वाहतुकीवर परिणाम झाला आणि काही ठिकाणी पाणी साचून शेतात काम करणेही अशक्य झाले. त्यामुळे आगामी हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांनी पुढील शेती कामांची आखणी करावी, योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत.