6 ऑक्टोबरपर्यंत कामं उरकून घ्या, पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

सध्या राज्यात पावासाचा (Rain) जोर कमी झाला आहे. अनेक भागात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातला होता. पण आजपासून राज्यात विखुरलेल्या स्वरुपात भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली. आजपासून राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी 6 ऑक्टोबरपर्यंत शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत. सोयाबीन, उडीद याची काढणी करावी असं आवाहन डख यांनी केलं आहे. 

6 ऑक्टोबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, 6 ऑक्टोबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे. अनेक ठिकाणी जास्त वेळ पाऊस पडणार नाही. पण अचानक पाऊस येण्याची शक्यता असल्याचे डख म्हणाले. 

तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता

28 सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबरपर्यंत खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर व मराठवाड्यात अशा 18 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तसेच मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात मात्र अशा प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यानच्या पाच दिवसात जाणवू शकते अशी माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात पावसाची स्थिती काय?

सहा ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून 13 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे 16 ऑक्टोबरनंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे खुळे म्हणाले.  

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *