गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर इतका वाढला आहे की काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे महामार्ग बंद करावे लागले. रस्ते खचले असून, काही भागांत रस्त्यांना तडे गेले आहेत. हवामान विभागाच्या अलिकडील इशाऱ्यानुसार राज्यातील सिंधुदुर्गपासून ते गोंदियापर्यंत सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात पावसाचं धुमशान सुरूच आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असून, १७ ते २० जून दरम्यान या भागांत सातत्याने अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत १८ जूनला काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पुरेशी तयारी ठेवावी. १९ व २० जूनला पावसाचा जोर थोडासा कमी होऊन मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असा अंदाज आहे
मध्य महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा जाणवतो आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर १७ ते २० जूनदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला असून, त्यामुळे दरडी कोसळणे, पूर येणे अशा आपत्तीजनक घटनांची शक्यता नाकारता येत नाही. पुणे शहरासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांच्या मैदानी भागात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत १७ जूनला हलका ते मध्यम पाऊस होणार आहे, मात्र २० जूनपर्यंत पावसाचा जोर कमी होऊन तुरळक सरींचे प्रमाण राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांमध्येही १७ ते २० जूनदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे अस्तित्व जाणवेल. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत १७ ते २० जूनदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यासोबतच विजांच्या कडकडाटासह तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाड्यात मात्र पावसाची स्थिती काहीशी सौम्य राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये १७ ते २० जूनदरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. विशेषतः परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत २० जून रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.