महाराष्ट्रात यंदा मोसमी पावसाची सुरुवात अपेक्षेपेक्षा थोडी लवकर झाली असून, त्याचा परिणाम राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आला आहे. हवामान विभागाच्या २० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्र या दोन विभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. याउलट, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाची वाट पाहण्याची स्थिती अजूनही कायम आहे.
कोकण विभाग हा नेहमीच जास्त पावसाचा भाग समजला जातो. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी चांगला पाऊस पडतो. या तुलनेत पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने थोडे कमी असते. यंदा मात्र पावसाच्या सुरुवातीपासूनच कोकणात जोरदार सरी पडत असून, हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार १ ते २० जूनदरम्यान कोकणात सरासरीच्या ३७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. या कालावधीत कोकणात सरासरी ३९१ मिमी पाऊस अपेक्षित असतो, परंतु यावर्षी ५३४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाची समाधानकारक हजेरी
मध्य महाराष्ट्रात देखील यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. या भागात २० जूनपर्यंत १२८.९ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही मात्रा सरासरीच्या तुलनेत ३८ टक्के अधिक आहे. सामान्यतः या कालावधीत ९३.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो. पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांत चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पाऊस
दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. विदर्भात पावसाची कमतरता ५७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. जून महिन्यात विदर्भात अजूनही तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदले जात आहे. मराठवाड्यातही ३९ टक्के पावसाची कमतरता असून, अपेक्षित ८६.५ मिमीच्या तुलनेत पाऊस फार कमी पडला आहे. यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीसच शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाचा पुढील अंदाज काय?
हवामान विभागाने आगामी चार ते पाच दिवसांसाठी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच धुळे, नंदूरबार, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील भागात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवस पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे, जो शेतीसाठी काही प्रमाणात सकारात्मक ठरू शकतो.