राज्यात मान्सून गेला विश्रांतीवर! शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

राज्यात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला असून, 26 मे रोजी कोकण पट्टीत पावसाने दमदार सुरुवात केली होती. कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. अनेक भागांत जोरदार सरींनी हजेरी लावली आणि काही ठिकाणी जमिनी भिजल्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झालं. परंतु, या दमदार सुरुवतीनंतर आता पावसाची गती मंदावली असून, हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस मान्सून विश्रांती घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचा अर्थ असा की, 12 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी राहील, तर काही भागांत फक्त हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

या अचानक आलेल्या बदलामुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. विशेषतः कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कृषी विभागाकडून देखील स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की, पेरणीची घाई अजिबात करू नये. कारण हवामान स्थिर न झाल्यास, पेरलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता अधिक आहे. जमिनी कोरड्या राहिल्यास बी उगवणार नाही, पिकाच्या वाढीस अडथळा येईल आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे शासन आणि कृषी तज्ज्ञ यांचा सल्ला विचारात घेणे फार महत्त्वाचे आहे.

मान्सूनची गती मंदावण्यामागील कारणे?

मान्सूनची गती का मंदावली, याचे प्रमुख कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सध्या कमकुवत झाला आहे. सुरुवातीला हे वारे जोरात आले आणि मान्सूनने भारतात लवकर प्रवेश केला, पण त्यानंतर वातावरणातील बदलामुळे या वाऱ्यांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे पावसाचा प्रवास थांबला असून, पुढील काही दिवस हेच चित्र राहण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. जून महिन्याच्या पहिल्या दहा ते बारा दिवसांत पावसाची प्रगती फारशी न होण्याची शक्यता असून, 12 जूननंतर पुन्हा एकदा पावसाचे वळण राज्याच्या दिशेने वळण्याची चिन्हे आहेत.

विदर्भामध्ये पावसाची शक्यता

दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि काही इतर भागांत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याची किंवा शेतीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी अति उत्साहाने पेरणी किंवा अन्य शेती कामे सुरू न करता, अधिकृत हवामान अंदाजावर विश्वास ठेवूनच शेतीचे नियोजन करावे. स्थानिक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी कार्यालयांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेणे केव्हाही अधिक फायदेशीर ठरेल. हवामानाच्या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संयम आणि योग्य नियोजन हेच शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल. हवामान खात्याकडून दररोज अद्ययावत माहिती दिली जात असून, ती तपासून पुढील निर्णय घेणे शहाणपणाचे ठरेल.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *