जनावरं जगवायला तरी पाणी सोडा !

पाण्याची कमतरता: वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ‘आम्हाला जनावरे जगवण्यापुरते तरी योजनेचे पाणी सोडा’ अशी आर्त हाक या भागातील शेतकरी प्रशासनाला घालू लागले आहेत.

योजना सुरू झाल्यानंतर त्याबाबत आढावा बैठक घेऊन योजनेचे पाणी पाणीपुरवठा स्रोत व जनावरांच्या पाण्यासाठी प्राधान्याने देण्याचे निश्चित करण्यात आले होते. यामुळे सर्वच गावातील लाभ धारक शेतकऱ्यांना आता उन्हाळ्यात जनावरांचा पाणी व चाऱ्याचा प्रश्न मिटेल असे वाटले होते.

मात्र, प्रत्यक्षात योजना सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी जाऊनही योजनेच्या लाभार्थी भागातील टेलला पाणी पोचले नाही. यामुळे शेतीसह जनावरांच्याही पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गावांना मिळालेला पिण्याच्या पाण्याच्या विहिरीलगतचा नाला वगळता अद्याप गावात कुठल्याही शेतकऱ्याला जनावरांसाठी मागणी करून ही पाणी मिळत नाही. याबाबत ग्रामस्थ आपापल्या जवळील पुढाऱ्यांकडे हेलपाटे मारत असताना देखील महिनाभरात त्यांना आश्वासनापलीकडे काहीच मिळू शकले नाही. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.

जनावरांना पिण्यासाठीच पाणी नसल्याने चाऱ्याचा प्रश्न तर मोठ्या प्रमाणात आ वासून बसला आहे. योजनेच्या लाभार्थी भागातील काही ठिकाणी उसासारख्या पिकांना पाणी मिळत असताना आम्हाला जनावरांसाठी पाणी का मिळत नाही.

यामुळे या भागातील पशुपालक शेतकरी संतप्त झाले आहेत. आम्ही योजनेच्या टोकाला आहे हा आमचा दोष आहे का असा सवाल देखील या भागातील शेतकरी करू लागले आहेत.

पुरंदर योजनेचे पाणी तातडीने टेल भागात न सोडल्यास जनावरांसह पुरंदर उपसा योजनेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून पशुपालक बसणार आहेत. महिनाभरात पाच वेळा वेगवेगळ्या तारखांना पाणी सोडण्याचे आश्वासन देऊनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

  • सुनील यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य, माळशिरस

उन्हाळ्यामुळे पाण्याची सर्वत्र मागणी जास्त असल्याने एकावेळी सर्वांना नियोजन करता येणे शक्य होत नसल्याने पाणी देण्यात मागे पुढे होत आहे मात्र उद्यापासून पुढील टेलच्या भागांमध्ये दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल.

  • नीलेश लगड, शाखा अभियंता, पुरंदर उपसा सिंचन योजना

स्रोत : ऍग्रोवन

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *