शेतकरी नियोजन : पशुपालन
शेतकरी : लक्ष्मण खेडेकर
गाव : वाजेघर, ता. वेल्हा, जि. पुणे
शेती : साडेतीन एकर
गायींची संख्या : चार व वासरे तीन.
वेल्हा तालुक्यातील वाजेघर येथील लक्ष्मण खेडेकर यांच्याकडे एकूण साडेतीन एकर शेती आहे. खरीप हंगामात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. यंदाही अडीच एकरांवर भाताची लागवड केली आहे. यासोबत कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. दुग्ध व्यवसायासाठी देशी गीर गायीचे संगोपन केले जाते. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागत आहे.
मी गेल्या पाच वर्षांपासून देशी गीर गायींचे संगोपन करत आहे. एकूण चार गायी असून, तीन वासरे आहेत. शेतातच २५ बाय २० फुटाचा गोठा केला आहे. याशिवाय मुक्त संचारासाठी शेतात १०० बाय १०० फुटाचा गोठा आहे. त्यामुळे दुधाचे चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते. Cow Rearing
जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून शेतात हत्ती घास, कडबा, गवताची लागवड असते. त्याला पूरक म्हणून भाताचा भेळा वापरल्यामुळे खर्चात मोठी बचत होते. दीड एकरावरील हत्ती घासाची कापणी दर पंधरा दिवसांनी केली जाते.
सकाळी चारा कापणी केल्यानंतर कुट्टी मशिनवर कुट्टी करून जनावरांना देतात. अशी कुट्टी जनावरे संपूर्ण खात असल्यामुळे चारा फारसा वाया जात नाही. दिला जातो. तीन वर्षांपूर्वी लावलेला हत्ती घास पाच वर्षांपर्यंत उत्पादन देत राहील. एकावेळी प्रति जनावरांना २० ते २२ किलो खाद्य जनावरांना दिले जाते. सकाळी व दुपारी एकच चारा देण्याऐवजी त्यात बदल केला जातो. जनावरांना सर्व पोषक घटक मिळतात. याशिवाय उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास बनवून साठवण केली जाते. अडचणीमध्ये त्याचा वापर करता येतो. Cow Rearing
दूध उत्पादन :
सध्या दररोज सर्व गायी मिळून १२ लिटर दूध उत्पादन होते. सर्व दुधावर केंद्रावरच प्रक्रिया करून तूप बनविले जाते. एक महिन्याला १४ ते १५ किलो तूप उपलब्ध होते. त्याची पुण्यात विक्री केली जाते.
याशिवाय देशी गायीच्या शेणापासून धूप, दंत मंजन, साबण अशा विविध वस्तू बनविल्या जातात. दरमहा ९० हजार रुपयांपर्यत उलाढाल होते. त्यातील ४० हजार रुपयांपर्यत खर्च वजा जाता ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
चाऱ्याचे नियोजन :
– हत्ती घासाची लागवड करतानाच दर पंधरा दिवसांनी कापणी होईल, असे नियोजन केले.
– आगामी काळात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठिबक सिंचन करण्याचे नियोजन आहे.
– जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी आतापासूनच चारा साठवण, मुरघास यावर भर देत आहे.
– वाळलेला चारा साठवत आहे.
– सध्या चारा बऱ्यापैकी आहे. भात कापणीनंतर भाताचा भेळा गोळा करणार आहे.
– रब्बी हंगामात ज्वारीचा कडबा, गहू, हरभरा यांचा भुस्सा शेतकऱ्यांकडून खरेदीचे नियोजन आहे.
– अगदीच गरज भासली तर ऊस वाढे घ्यावे लागेल.