वाटाण्याने गाठले २०० रुपये किलो

ओतूर बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले असून, त्यामागे सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना काढणी करता न आल्याने आलेली आवक कमी हे मुख्य कारण आहे. मागणी वाढलेली आणि पुरवठा घटलेला असल्यामुळे भावांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. विशेषतः हिरव्या वाटाण्याच्या शेंगांनी बाजारात चांगलाच धमाका केला असून त्याचा दर तब्बल २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. ही दरवाढ शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर असली तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी मात्र ही परिस्थिती खिशाला चटका लावणारी ठरत आहे.

ओतूरच्या गुरुवारी पार पडलेल्या आठवडी बाजारात अनेक भाज्यांचे दर सरासरीपेक्षा दुपटीने वाढलेले दिसले. टोमॅटो जो नेहमी २०-२५ रुपये किलो मिळत असे, तोच आता ४०-५० रुपयांपर्यंत विकला जात आहे. याचबरोबर गाजर, गवार, घेवडा, भेंडी, वाल या भाज्यांच्या किंमतीतही तीव्र वाढ झाली आहे. गाजर आणि गवार प्रत्येकी ८० रुपये किलो, घेवडा आणि वाल प्रत्येकी १०० रुपये किलो, तर भेंडी ५० ते ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. वांगी देखील ४० रुपये पावशेर या दराने म्हणजेच १६० रुपये किलो दराने मिळत आहे. ही दरवाढ विशेषतः उपभोक्त्यांच्या बजेटवर परिणाम करणारी ठरत आहे.

पावसाचा थेट परिणाम केवळ काढणीवर नाही तर वाहतुकीवरही झाला असून, त्यामुळे शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचत नाही. या परिस्थितीत बाजारपेठेत ताज्या भाज्यांची आवक घटलेली आहे आणि त्यामुळेच दरांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. याचवेळी काही भाज्यांचे दर मात्र घसरलेले दिसत आहेत. उदा. कोथिंबीरची जुडी जी पूर्वी ४० ते ६० रुपयांना मिळत होती ती आता फक्त १० ते २० रुपयांपर्यंत खाली आली आहे. मेथीची जुडी ३० रुपयांत, पालक २० रुपये, शेपू १५ रुपये अशा दराने उपलब्ध आहे.

याशिवाय, भुईमूग शेंगाही सध्या बाजारात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बाजारात ती ४० ते ५० रुपये किलो दराने विकली जात आहे. मात्र किरकोळ विक्रेत्यांकडून हाच माल ७० ते ८० रुपये किलो या दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारामध्ये शेंगांनी शंभरी पार केली असून, ग्राहक यामुळे हैराण झाले आहेत.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *