कर्जफीसह विविध शेती प्रश्नावरुन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. सरकार कर्जमाफी कधी करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. योग्य वेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करु असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. कोणताही प्रश्न हा चर्चेने सुटतो. त्यांच्याशी चर्चा करायला राज्य सरकार तयार आहे. या संदर्भात सरकार आणि प्रशासन नियमित त्यांच्या संपर्कात असल्याचे अजित पवार म्हणाले.
खत आणि बियाणे लिंकिंग करणाऱ्या दुकानदार आणि कंपन्यांना सरकार सोडणार नाही असेही अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना लुटू पाहणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल. दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल असेही अजित पवार म्हणाले. सरकार लाडक्या बहिणींना नियमित 1500 रुपये देण्यासाठी तत्पर असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच योग्य वेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करु असेही ते म्हणाले.
आम्हीही विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना कामासाठी भेटत होतो
राज्यातले विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना काही मुद्द्यांवर भेटत असतात. महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे. आम्हीही विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या कामासाठी भेटत होतो असे अजित पवार म्हणाले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज तासभर चर्चा झाली आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सहकार क्षेत्रातल्या निवडणुका या पक्षाच्या चिन्ह आणि नावावर होत नाहीत. याआधीही अशा निवडणुकांमध्ये अनेक वेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन निवडणूक लढले आहेत असे अजित पवार म्हणाले. दारुचे भाव कितीही वाढवले तरी पिणारे दारु पितातच असेही अजित पवार म्हणाले.
कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे अन्नत्याग उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे. पण ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार? हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.