महाराष्ट्रात जुलै महिन्यात भरपूर पाऊस, पण कोणत्या भागात राहणार पावसाचा खंड?

महाराष्ट्रात २०२५ साली पावसाळ्याचा जो अंदाज वर्तवण्यात आला आहे, तो शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, या पावसात पाच टक्क्यांची घट किंवा वाढ होऊ शकते. या अंदाजामध्ये कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी तुलनेने कमी असल्याने काही भागांमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता जास्त आहे.

डॉ. साबळे यांच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार असून मे महिन्यात देखील जास्त पाऊस पडला होता. त्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. यामुळे वातावरणात अधिक ओलावा निर्माण झाला असून त्यामुळे सुरुवातीच्या काळात जोरदार पावसाचे प्रमाण पाहायला मिळाले. मात्र, जूनच्या पहिल्या १० ते १२ दिवसांपर्यंत पावसाचे प्रमाण तुलनेत कमी राहील, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. डॉ. साबळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्या भागात जमिन हलकी आहे, तिथे पेरण्या थोड्या उशिरा कराव्यात. कारण अशा जमिनीत ओलावा टिकत नाही आणि पावसाचा खंड असल्यास पिकांना मोठा फटका बसू शकतो. मात्र, ज्या भागांमध्ये जड, काळी जमिन आहे आणि ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता आहे, तिथे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू कराव्यात, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

राज्यातील विविध भागात कसा राहील पावसाचा खंड?

राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा खंड कसा राहील, यावरही डॉ. साबळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. अकोला, धुळे, राहुरी, परभणी, कोल्हापूर, पाडेगाव आणि निफाड या भागांमध्ये पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. तर दापोली, पुणे, सोलापूर, नागपूर, जळगाव आणि कराडसारख्या भागांमध्ये पावसाचा खंड लहान कालावधीसाठीच असेल. यामधून हे स्पष्ट होते की, पाऊस संपूर्ण राज्यात समान प्रमाणात आणि सातत्याने पडणार नाही. काही भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी कोरडे हवामान राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अभ्यास करूनच शेती नियोजन करणे गरजेचे आहे.

याशिवाय, हवामानातील दीर्घकालीन बदलांचा परिणाम भविष्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. साबळे यांनी सांगितले की, आशिया खंडात सध्या ६० टक्क्यांहून अधिक वनक्षेत्र कमी झाले आहे. परिणामी, वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेणारी यंत्रणा कमकुवत झाली आहे. त्याच वेळी, मानवनिर्मित क्रियांमुळे म्हणजे वाढते सौर प्रकल्प, रस्ते, आणि इमारती यामुळे जमिनीच्या नैसर्गिक रचनेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत हवामान बदलाचे प्रमाण आणखी वाढेल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *