राज्यभरात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने हजेरी लावली असून जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केलाय. सलग पाचव्या दिवशी जालन्यात तुफान पाऊस सुरू असून भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात आज वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झालाय .एक जण गंभीर जखमी आहे . गेल्या दोन दिवसात जालन्यात वीज पडून एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे .
गणेश जाधव(32) सचिन बावस्कर (28) अशी मृतांची नावे असून शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे . रविवारीही जालन्यात वीज पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता . गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्व दूर जोरदार अवकाळी पाऊस पडतोय . यामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे . वादळी वाऱ्यांसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरधारा सुरू आहेत . 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
रविवारी वीजा कोसळून भोकरदनमध्ये दोन ठार
जालना जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली . भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोन जण मृत्युमुखी पडले होते .अनेक जनावरे दगावली असून शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे . झोपडीवर वीज कोसळल्याने भोकरदन तालुक्यातील राहुल विठ्ठल जाधव 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला .तर भायडी गावच्या शिवारात वीज पडल्याने रामदास कड यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
फळपिकांचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून विविध तालुक्यांमध्ये विजांसह जोरदार अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे केळी, द्राक्ष, भाजीपाला अशा फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जालना, बदनापूर, अंबड, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांतील शेतकरी यामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. या भागांमध्ये फळपिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात असल्याने नुकसानाचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी आंब्याच्या कैऱ्या झाडावरून खाली पडून जमिनीवर फेकल्या गेल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं चित्र आहे. मोसंबी आणि डाळिंब पिकांनाही वाऱ्यामुळे फळगळ होऊन नुकसान सहन करावं लागलं.