राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पाऊस (Rain) जोरदार हजेरी लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं काही भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर काही भागात शेती पिकांना फटका देखील बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोली (Hingoli) शहरांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे शहरात सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. जोरदार पावसामुळे शहरातील संत नामदेव हळद मार्केट यार्डमधील शेतकऱ्यांची हळद भिजली आहे. व्यापाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हळद भिजली आहे. लिलाव होऊन सुद्धा व्यापाऱ्यांनी हळद मोजून न घेतल्याने हळद भिजल्याचा आरोप
लिलाव होऊन सुद्धा व्यापाऱ्यांनी हळद मोजून न घेतल्याने हळद भिजल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उलट व्यापाऱ्यांची हळद सुरक्षित आहे. मात्र शेतकऱ्यांची हळद मोठ्या प्रमाणात भिजली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
नाशिक शहरासह परिसरात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
ऐन उन्हाळ्यात गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसभर ढगाळ हवामानानंतर सायंकाळी आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शहराच्या अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कार्यलाय सुटण्याच्या वेळेत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
यवतमाळच्या महागाव तालुक्यातही जोरदार पाऊस
यवतमाळच्या महागाव तालुक्यात दुपारपासून हलक्या स्वरूपाचा वळवाचा पाऊस पडत होता. अशातच सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटा सह जोरधार वळवाचा पाऊस पडत आहे. तालुक्यातील टेंभी शिवारातील पिंपळगाव इजारा येथील महिला हळद काढणीचे शेतात काम करत असताना विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. यात महिलेचा मृत्यू झाला. विमलबाई किसन भिसे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 20 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.