पावसाचा जोर वाढला, अनेक भागात वादळी वाऱ्यासह वरुणराजाची जोरदार हजेरी, काही भागात पिकांना फटका

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे. पण दुसऱ्या बाजुला या पूर्वमोसमी पावासाचा काही भागात शेती पिकांना देखील फटका बसला आहे. त्यामुळं सध्या काही भागातील शेतकरी चिंतेत आहे. जाणून घेऊयात राज्यात कुठे कुठे पावसानं हजेरी लावली.

नांदेडमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी  पावसाची हजेरी

नांदेडमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री नांदेडला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर आज देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचल्याने मनपाचे पितळ उघडे पडलं आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस 

परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तीन दिवसानंतर पुन्हा एकदा परभणी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वारे विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परभणीसह मानवत गंगाखेड पूर्णा तालुक्यात जोरदार वादळी वारे विजा आणि पाऊस झाला आहे. ज्यामुळं वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. मानवत तालुक्यात तर पावसाचा जोर एवढा होता की मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पाणी साचले आहे.

बीडमध्ये पावसामुळं 25 एकर क्षेत्रावरील कांदा बाधित 

बीड तालुक्यातील कुटेवाडी शिवारात झालेल्या पावसाने 25 एकर क्षेत्रावरील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील चार दिवसांपासून सतत पावसाची हजेरी आहे. याचा परिणाम काढणीला आलेल्या पिकांवर पाहायला मिळतोय. कांद्यासह उन्हाळी ज्वारीचे देखील पावसात प्रचंड नुकसान झालंय. पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यात जोरदार पाऊस, वीज पडल्याने 7 बकऱ्या दगावल्या

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गुगुळ पिंपरी शिवारात अवकाळी पावसात वीज पडल्याने 7 बकऱ्या दगावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये वादी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला होता. दरम्यान गुगुळ पिंपरी शिवारात संबंधित शेतकरी सायंकाळच्या सुमारास बकऱ्या घेऊन घराच्या दिशेने जात असताना अचानक वीज पडल्याने या सात बकऱ्या दगावल्याची ही घटना घडली आहे.

वाशिमच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा आक्रोश, दिल्लीतून केंद्रीय कृषी मंत्र्यांचा थेट फोन, मदतीचं आश्वासन

वाशिमच्या मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं भुईमुगाचे पीक मुसळधार पावसामुळं संपूर्ण वाहून गेल्याच्या घटनेला दोन दिवस झाले. गौरव पवार यांनी आपले पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, वळीवाच्या जोरदार पावसाने काही क्षणातच त्यांच्या मेहनतीचे पाणी झालं आणि  पीक वाहून गेलं होतं. या  गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी थेट दिल्लीहून वाशिम जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ या शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने गौरव पवार यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. आज गौरव पवार यांना बाजार समितीकडून मदत दिली जाणार आहे.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *