राज्यात आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 17 मे पासून 25 मे पर्यंत पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलाय. हा पाऊस दोन दोन दिवसांच्या अंतराने कोसळणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी मशागतीला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. काही दिवसांपासून राज्यातील हवामानात टोकाचे बदल दिसत असताना मान्सूनपूर्व पावसाचे आता आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Weather Update)
पंजाबराव डख यांचा अंदाज काय?
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, 17 मेपासून 25 मेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस हा दोन दोन दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या भागांमध्ये कोसळणार असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असेल.शेतकऱ्यांनी 30 मेपर्यंत आपली शेतजमीन मशागत करून तयार ठेवावी, असा सल्लाही पंजाब डख यांनी दिला आहे. या पावसामुळे शेतात सुमारे एक फूट ओलावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा पाऊस मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक प्रमाणात पडेल. त्याचबरोबर पूर्व व पश्चिम विदर्भातही पावसाचा जोर असेल. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा जोरही काही भागांत जाणवू शकतो. नागरिकांनी विजेपासून सुरक्षित अंतर ठेवावे, झाडांखाली थांबू नये, असे आवाहनही डख यांनी केले आहे.
राज्यभरात वादळी वारे, मुसळधार पाऊस
हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळं देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, काही भागात पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील आठवड्यात देखील पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यात 20, 21 व 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दि. 31 मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.