15 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा तातडीचा इशारा

राज्यात पावसाचे आगमन जोरात होत असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहेत. हवामानातील बदलामुळे तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. विदर्भात मागील काही दिवसांपासून तापमान ४४ अंशांच्या आसपास पोहोचले होते. मात्र आता पावसाला पोषक हवामानामुळे पाऱ्यात मोठी घसरण झाली आहे. १२ जूनच्या सकाळी अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर अकोला येथे ३९ अंश तापमान होते. उर्वरित भागांमध्ये तापमान ३९ अंशांच्या खाली आले असून थोडक्याच शब्दात सांगायचं झालं, तर उन्हाच्या झळा कमी होत चालल्या आहेत.

13 जून पासून राज्यात मुसळधार पाऊस

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने १३ जूनपासून पुढील काही दिवसांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या पावसाचा धोका लक्षात घेऊन रेड अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच या जिल्ह्यात नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, पूर येणे किंवा वाहतूक अडथळ्याची शक्यता नाकारता येत नाही.

रत्नागिरीसोबतच रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे नागरिकांनी आणि प्रशासनाने खबरदारी घ्यावी, कारण हवामान धोकादायक ठरू शकते. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.

राज्यातील या जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. येलो अलर्ट म्हणजे हवामान सामान्यापेक्षा वेगळे राहण्याची शक्यता असते, जसे की जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे आणि बाहेर पडताना काळजी घ्यावी.

धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, वर्धा, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा अंदाज असून त्यामुळे विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मान्सूनची स्थिती काय?

मॉनसूनचा प्रवासही आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला २६ मे रोजी मुंबई, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आदी भागांमध्ये मॉन्सून पोहोचला होता. मात्र त्यानंतर काही काळासाठी त्याची गती थांबली होती. आता हवामान अनुकूल होत चालल्यामुळे १४ जूनपासून विदर्भासह छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागांमध्येही मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाला आणखी बळ मिळत आहे.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *