राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होणार असून याचा थेट फायदा खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना होणार आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला होता. विशेषतः पूर्वमोसमी पावसामुळे अनेक भागांत शेतीची कामे अडचणीत आली होती. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं, नदी-नाल्यांना पूर आला होता आणि धरणांचा जलसाठाही वाढलेला दिसून आला. यामुळे काही पिकांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
या कालावधीत राज्यात पावसाचा ब्रेक
मात्र, आता हवामान कोरडे राहणार असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मशागत करण्यास आणि पेरणीपूर्व तयारीसाठी संधी मिळणार आहे. पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 31 मे पासून 6 जून पर्यंत राज्यात जोराचा वारा वाहणार असून या काळात पावसाची शक्यता नाही. यामुळे या आठवड्यात संपूर्ण राज्यात चांगले सूर्यदर्शन राहील आणि हवामान कोरडे राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन तयार ठेवावी, मशागत पूर्ण करून पेरणीसाठी तयारी करून ठेवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस
6 जूनपर्यंत पावसाचा धोका नसल्यामुळे ही वेळ खरीप पेरणीपूर्व मशागतीसाठी अत्यंत योग्य आहे. विशेषतः ज्याठिकाणी माती थोडी जास्त ओली झाली होती, तिथे उन्हाच्या जोराने ती पुन्हा कोरडी होईल आणि पेरणीस योग्य स्थितीत येईल. त्यानंतर 7 जूनपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. डख यांच्या म्हणण्यानुसार 7, 8, 9 आणि 10 जून दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये, म्हणजेच पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खान्देश, कोकण आणि मराठवाडा यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः या काळात पावसाचे प्रमाण दररोज विभाग बदलून होईल.
ही माहिती शेतकऱ्यांसाठी फारच महत्त्वाची आहे कारण या काळात पावसानं उघडीप दिल्यामुळे खरीप पेरणी योग्य वेळी आणि नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल. यावर्षी मान्सून देशात 12 दिवस आधी दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रातही त्याचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर झाले आहे. त्यामुळे जूनच्या सुरुवातीलाच काही भागांत जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला, तरी काही ठिकाणी पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. पण सध्या निर्माण झालेलं कोरडं हवामान त्यांच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आलं आहे.
पंजाबराव डख यांच्या भाकितामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाची तयारी निश्चितपणे सुरू करता येणार आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने शेतजमिनी मशागत करून तयार करता येतील आणि 6 जूननंतर संभाव्य पावसाच्या आगमनामुळे वेळेवर पेरणी करता येईल. यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून, शेतीमध्ये स्थैर्य येऊ शकतं. राज्य शासन आणि कृषी विभागाने देखील या हवामानाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावं, ही काळाची गरज आहे.