राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने (Monsoon) हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे. अनेक जिल्ह्यात बरसून गेलेल्या पावसाची दाहकता आता समोर आली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परिणामी पावसामुळं बळीराजा पुन्हा हवालदिल झाला असून सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अन् रानात पाणीच पाणी बघायला मिळत आहे.
कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान, कोथिंबीरीचा झाला चिखल
उन्हाळी कोथिंबीर शेतकऱ्याला आर्थिक फायदा करून देणारी असते. मात्र गेली दहा ते अकरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनावरती अक्षरशा: पाणी फिरवले आहे. जास्त आणि सलग सुरू असलेल्या पावसामुळे उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोथिंबिरीचा चिखल होण्यास सुरुवात झालीय. शिल्लक कोथिंबीर देखील पदरात पडेल का नाही? याची खात्री नसताना त्यासाठी देखील शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. सध्या खुरपणीची काम सुरू आहेत. पुढील एक-दोन दिवस पाऊस झाला तर संपूर्ण पिकाचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केलीय.
खामगाव तालुक्यात 70 वर्षीय वृद्ध नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला
बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील घारोड परिसरात काल सायंकाळी ढगफुटी सदृश पाऊस बरसल्याने अनेक नदी , ओढ्याना पूर आला. यात धोंडू इंगळे नावाचे 70 वर्षीय वृद्ध नाल्याच्या पुरात वाहून गेले. स्थानिकांनी रात्रभर शोध घेतला असता अद्याप वाहून गेलेला वृद्ध इसम सापडलेला नाही.
पावसाने शेतीला आल तळ्याच स्वरूप, खरिपासाठी केलेली मशागत गेली वाया
गेल्या आठवड्याभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव , शेगाव, संग्रामपूर तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस बरसत आहे. काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी शेतीला तळ्याचे स्वरूप आल आहे. त्यामुळे खरिपासाठी केलेल्या मशागती वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं भात पिकाचं प्रचंड नुकसान
भंडारा जिल्ह्यात काल (27 मे) दुपारनंतर मेघगर्जना आणि वादळीवाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. पुन्हा मध्यरात्रीला सुरू झालेला हा पाऊस आज सकाळपर्यंत अनेक भागात कोसळला. यात अनेक भागातील कापणीला आलेला भातपीक भुईसपाट झाला. तर, अनेकांनी कापणी केलेलं भातपीक पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावा लागतोय. मागील आठवड्यात मान्सूनपूर्व पावसानं अक्षरश: झोडपून काढलं होतं. त्यात भातपिकाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा काल आलेल्या पावसानं शेतकऱ्यांना फटका बसला. वादळी वाऱ्यानं भुईसपाट झालेल्या भातपिकाची कापणी करण्याकरिता आता शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडणार असल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झालाय.
पचगंगा नदीची पाणीपातळी 20 फूट 3 इंच; मंदिरं गेली पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. तरीही पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्व नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीचे पाणी पातळी ही २० फूट ३ इंचावर पोहचली असून घाट परिसरातील मंदिरे ही पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, राजाराम, इचलकरंजी, रुई सह 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाले असून पर्यायी मार्गाने सुरू आहे दरम्यान राधानगरी धरण हे 50 टक्के भरले आहे.