राज्यात काल मान्सून दाखल झाला आहे. आज राज्याच्या विविध भागात मान्सूनची आगेकूच सुरु आहे. त्यामुळं अनेक भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व पावसानं देखील जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. जमिनीत पुरेशी ओल देखील गेली आहे. त्यामुळं वापसा आल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिला आहे.
जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही
राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे, त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना थांबावं लागेल. जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे तिथं वापसा आल्यावर पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळं राज्यातील 34 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
उन्हाळी हंगामात पिकं, फळ पिकं काढणीला आली आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळं राज्यातील 34 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्याठिकाणी पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामा पूर्ण झाला की त्याचा संबंधित अहवाल राज्य शासनाला देण्यात येईल, अशी माहिती पुणे विभागाचे कृषी संचालक र. शा. नाईकवाडी यांनी दिली आहे. मॉन्सून लवकर दाखल झाला आहे. 11 दिवस आधीच मॉन्सून दाखल झाला आहे. राज्यात 140 मिलिमीटर मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. त्यामुळं वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावं असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे.
राज्यातील विविध भागात आता मान्सून दाखल होण्यास सुरुवात
राज्यातील विविध भागात आता मान्सून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे . सोमवार सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे .अरबी समुद्र खवळला असून सकाळी समुद्राला भरती आल्याने मोठमोठ्या लाटा उसळत आहेत . मान्सून न महाराष्ट्रातील काही भाग व्यापला असून मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे .पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे आज ठाणे, मुंबई ,रायगड ,रत्नागिरी, पुण्याच्या व साताऱ्याच्या घाट परिसरात, पावसाचा रेड अलर्ट आहे . आज पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे .