खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची (Farmer) फसवणूक होत असते. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावण्याची शक्यता असल्याने ही शेतकर्याची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 14 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून 14 ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, एका विशिष्ट बियाण्याच्या संदर्भात आग्रह धरू नये, तर खताची लिंकिंग करण्यासाठी विक्रेत्यांकडून जबरदस्ती होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, अस आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
खरीप कर्ज वाटप करताना बँकांचा अकडता हात
जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 2200 कोटी रुपये पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटपाचे उद्दिष्ट्य असून आतापर्यंत केवळ 524 कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. लक्षांकाच्या 24 टक्केच कर्ज वाटप झाले. त्यामुळे राष्ट्रीयीकृत, खासगी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक अश्या 17 बँकेच्या 277 शाखेतून या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना शेतक-याप्रती असलेले आठमुडे धोरण पुन्हा चव्हाटयावर आले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज वाटप करताना सिबीलची अट न लावण्याची घोषणा केली होती. असे असतानाही बँकांनी अकडता हात घेत आहे. जिल्हात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शेतकरी लागवडपूर्व मशागतीच्या कामाला लागला. मात्र पीक कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे. पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा, अशी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी सावकाराच्या दारी जाऊन अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसा घ्यावा लागणार आहे.
अवकाळी पावसामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान
गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर परिसरातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान पिकाची लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. शेतीचे पंचनामे करू तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.