राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या पावसामुळं उन्हापासून नागरिकांची सुटका झाली आहे. दरम्यान, अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी हवामानाच्या संदर्भात अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भासह, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
मुंबईत शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. वांद्रे, अंधेरी, बोरिवली, खास आणि गोरेगाव परिसरात सकाळपासूनच हलक्या सरी बरसल्या होत्या. आज रविवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढणार
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 17 ते 20 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात मागील 8 ते 10 दिवसांपासून पाऊस सरींवर सरी कोसळतायेत
अंदमानात दाखल झालेला मान्सून कोकणात देखील लवकरच दाखल होणार आहे. सध्या कोकणातील वातावरण मान्सूनच्या आमगमानाची चाहूल देणारं आहे. कोकणात मागील 8 ते 10 दिवसांपासून पाऊस सरींवर कोसळत आहे. काही भागात वीज कोसळून माणसं दगावनं आणि जखमी होणे अशा घटना देखील समोर आल्या आहेत. वातावरणात होत असलेला बदल आणि कोसळणारा पाऊस पाहता मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे डोळे लागले आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढताना दिसून येत आहे. पण, प्रशासनानं मात्र नागरिकांना काळजी घेण्याचं, सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे.