ऊस पाचट व्यवस्थापनातून साधता येईल पाणीबचत !

ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक सरीत ठेवून कुजविल्यास पाच ते सहा टन सेंद्रिय खत मिळू शकते. तसेच एक ते दीड कोटी लिटर पाण्याची बचतही साध्य होते. 

ऊस पिकाच्या एक हेक्‍टर क्षेत्रामधून सुमारे दहा ते बारा टन वाळलेले पाचट मिळते. ते शेतात पसरून योग्य पद्धतीने कुजविल्यास अनेक फायदे मिळतात.

तणांचा प्रादुर्भाव कमी

उसाची पाचट न जाळता ती एक आड एक सरी किंवा सर्व सरीत पाचट दाबून घेतल्यास अनेक फायदे मिळतात. या आच्छादनामुळे जागेवर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. अन्नद्रव्याचा अपव्यय वाचतो. तसेच तण नियंत्रणासाठीच्या खर्चात बचत होते.

ओलावा जास्त काळ टिकतो

जमिनीवरील आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी होते. जमिनीतील ओलावा पंधरा ते वीस दिवस टिकून राहतो. यामुळे पाणी पाळ्यातील अंतर वाढते. सध्या उसाला हेक्‍टरी अडीच ते साडेतीन कोटी लिटर पाणी दिले जाते. पाचट आच्छादन व एक आड एक सरीत पाणी देण्यामुळे एक ते दीड कोटी लिटर पाणीबचत होते. शिवाय केशाकर्षनाद्वारा पाचट ठेवलेल्या सरीतील माती पाणी शोषते. लवकर वाफसा येतो. यामुळे मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

सेंद्रिय खत मिळते

एक हेक्‍टर क्षेत्रामधून सुमारे दहा ते बारा टन वाळलेले पाचट मिळते. ते कुजविल्यास सहा ते सात टन सेंद्रिय खत मिळते. पशुधन कमी झाल्याने शेणखताची उपलब्धताही कमी असलेल्या काळात हे सेंद्रिय खत उपयुक्त ठरते.

उत्पादनात भरीव वाढ

पाचट शेतात ठेवल्याने पाल्यातील मुख्य अन्नद्रव्ये उदा. नत्र 40 ते 50 किलो, स्फुरद 20 ते 30 किलो, पोटॅश 75 ते 100 किलो, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये, लोह, मंगल, तांबे, जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पाचटाचे विघटन होताना ऊस पिकास उपलब्ध होतात. याचा उत्पादनवाढीवर अनुकूल परिणाम दिसून येतो. पाचट तंत्रज्ञानामुळे उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ होते.

जमिनीचे तापमान

रुंद सरीवर उसाची लावण केल्याने जमिनीवर अधिक काळ सूर्यप्रकाश राहतो. पाचटाच्या आच्छादनामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. तसेच पाला कुजून सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते, त्यामुळे जीवाणू व गांडुळांची नैसर्गिकरीत्या वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून ती पिकास सुलभ उपलब्ध होतात.

आंतरपीक

खोडवा उसामध्ये पाला एक आड एक सरीमध्ये ठेवल्यामुळे एक सरी रिकामी राहते. त्यात आंतरपिके घेता येतात.

पाचटातील अन्नद्रव्ये (प्रमाण टक्के) +सूक्ष्म अन्नद्रव्ये (पीपीएम)

अन्नद्रव्ये +प्रमाण (टक्के) +अन्नद्रव्ये +प्रमाण (पीपीएम) 
नत्र +0.5 +लोह +2440 
स्फुरद +0.13 +मंगल +310 
पालाश +0.40 +जस्त +90 
कॅल्शिअम +0.55 +तांबे +30 
मॅग्नेशिअम +0.30 + 
गंधक +0.12

डॉ. एस. बी. पवार, 9422178982 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *