केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपनीने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देऊन निधी वितरित केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील रखडलेली पीक विमा नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. Fruit Crop Insurance
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शेतकरी तक्रार निवारण व पीकविमा समितीचे सी.ए. हितेश आगीवाल आणि अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२३-२४ मधील पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ज्या महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला होता.
अशा सुमारे २७ महसूल मंडळातील शेतकरी हे पीक विमा निकषाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अधिसूचित करून भरपाईसाठी पात्र ठरवले होते. पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देय असून ती तत्काळ देण्याबाबत कार्यवाही करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, असे निर्देश दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.