शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी सर्वांत मोठा अडथळा ठरणारा घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव. विशेषतः काँग्रेस गवत, लव्हाळा, वाघनखी, हरळी यांसारखी तणं शेतात एकदा आली की ती सहजासहजी जात नाहीत. या तणांमुळे पिकांची वाढ खुंटते, उत्पादनात घट होते आणि अनेकदा शेतकऱ्याला मजुरांचा खर्च, वेळ आणि मेहनत वाढवावी लागते. कांदा, लसूण, भाजीपाला, डाळिंब, फुलशेती अशा संवेदनशील पिकांमध्ये सुरुवातीच्या ४ ते ६ आठवड्यांत जर या तणांनी आक्रमण केलं, तर उत्पादनात ४० टक्क्यांपासून ते थेट ८० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. तणं पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश आणि जागेची स्पर्धा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी तण नियंत्रण ही प्रक्रिया लागवडीच्या आधीपासून आखून करणे आवश्यक ठरते.
तण नियंत्रणाची सुरुवात योग्य मशागतीपासून होते. शेतीचे खोल नांगरणी, त्यानंतर दोन वेळा कुळवणी केल्यास मातीतील तण बीज सूर्यप्रकाशाने नष्ट होतात. काही शेतकरी मशागतीनंतर जमिनीत प्लास्टिक मल्चिंगचा वापर करतात, ज्यामुळे जमिनीवर सूर्यप्रकाश न पडल्यामुळे तणांची उगमक्षमता रोखली जाते. याशिवाय सेंद्रिय मल्च म्हणजेच ऊसाचे पाचट, गवत, पेंढा यांचा थर पिकांभोवती पसरवल्यासही तणं उगवत नाहीत आणि मातीतील ओलावा टिकून राहतो. ही नैसर्गिक पद्धत असल्यामुळे जमिनीचे आरोग्यही चांगले राहते.
तण नियंत्रणासाठी खुरपणी ही पारंपरिक पद्धत असून ती अतिशय प्रभावी आहे. हाताने किंवा यंत्राच्या साहाय्याने तणं मुळासकट काढून टाकल्यास पुढील काही आठवडे पुन्हा तण वाढत नाहीत. मात्र ही प्रक्रिया मजुरांवर अवलंबून असल्याने खर्चिक ठरते, विशेषतः मोठ्या क्षेत्रात. यासाठी रासायनिक तणनाशके वापरणे हा पर्याय अनेक शेतकरी निवडतात. पेरणीनंतर लगेच, म्हणजेच २४ ते ४८ तासांच्या आत “पूर्व उगम तणनाशक” वापरले, तर ते जमिनीतून उगम होणाऱ्या तणांना नष्ट करते. यामध्ये पेंडीमेथालिन ३०% ईसी (३ मि.ली./लिटर) आणि ऑक्सिफ्लुरोफेन २३.५% ईसी (१ मि.ली./लिटर) हे प्रभावी ठरतात. तणं उगवल्यानंतर जर नियंत्रण करायचं असेल, तर क्लोडिनाफॉप-प्रोपार्गिल, प्रोपॅक्विझाफॉप किंवा क्विझालोफॉप इथाइल यांसारखी निवडक तणनाशके वापरली जातात. फवारणी करताना त्यात सिलिकॉन स्टिकर मिसळल्यास औषध झाडावर चांगल्या प्रकारे पसरते, त्यामुळे परिणामकारकता वाढते.
रासायनिक तणनाशकांचा पिकाच्या मुळांवर दुष्परिणाम होऊ नये म्हणून फवारणीनंतर काही दिवसांनी चिलेटेड झिंक वापरणे फायदेशीर ठरते. तणनाशकांमुळे पिकांच्या मुळांची वाढ थांबू नये, म्हणून अशा पूरक अन्नद्रव्यांचा वापर आवश्यक आहे. नर्सरी अवस्थेत, म्हणजेच बी टाकल्यानंतर १-२ दिवसात फवारणी केली, तर तण उगवण्यापूर्वीच नष्ट होतात. पुनर्लागवडीनंतर ४५-५० दिवसांनी दुसरी फवारणी किंवा खुरपणी करून तण नियंत्रण अधिक परिणामकारक करता येते.