प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनस्थळी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमरावतीचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) आले आहेत. बावनकुळे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?
दिव्यांगांना 6 हजार रुपये मानधन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. यासंदर्भात पुरवणी काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. कर्जमाफी संदर्भात दोन दिवसात कमिटी स्थापन करुन निर्णय घेतला जाईल अशी चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झाल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तर इतर 17 मागण्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक होईल असे कडू यांनी सांगितले.
बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का?
सध्या आम्ही उपोषण मागे घेणार नाही. उद्या आम्ही यावर चर्चा करु असे बच्चू कडू म्हणाले. पण चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी शेतकरी कर्जमाफी करु हे सांगितल्याचे बच्चू कडू म्हणाले.
शेवटी कमिटी करावीच लागते हे मलाही माहीत आहे. आम्ही कर्जमाफी मागितली नसती पण तुरीचे भाव घसरलेत, सोयाबीनचे भाव घसरलेत, आम्हाला योग्य भाव मिळाला तर आम्हीच सरकारचं कर्ज फेडू असेही कडू म्हणाले. दोन मुद्दे महत्वाचे आहेत. दिव्यांगांना इतर राज्यांप्रमाणे 6 हजार द्यावे असे कडू म्हणाले. शेतकरी सावकाराकडे जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांला नवीन कर्ज मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांसोबत पण बोलणं झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. आम्हाला वाटलं बावनकुळे साहेब लवकर येतील पण त्यांनी मला 6 दिवस उपाशी ठेवल्याचे बच्चू कडू म्हणाले.
सगळं राष्ट्र दुःखात आहे, त्यामुळं बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं, बावनकुळेंची विनंती
देशात खूप मोठी वाईट घटना काल घडली आहे. देशात हा पहिलाच इतका मोठा विमान अपघात घडल्याचे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. सगळीकडे शोक व्यक्त होत आहे. अशा दुःखात बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावे. शेवटी आपण निर्णय घ्यावा. सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे बावनकुळे म्हणाले. माझी विनंती आहे तुम्हाला शासनाची पण विनंती आहे. सगळं राष्ट्र दुःखात आहे, त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे ही विनंती असे बावनकुळे म्हणाले.