देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे एक आर्थिक दिलासा. पण सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय 20व्या हप्त्याकडे. कारण याआधी 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा झाला होता आणि त्यातून तब्बल 22,000 कोटींचा लाभ 9.8 कोटी शेतकऱ्यांना मिळाला. त्यामध्ये 2.41 कोटी महिला शेतकरीही होत्या. त्यामुळे आता पुढचा हप्ता म्हणजे जून 2025 मध्ये मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते, पण यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या
20वा हप्ता कधी मिळणार?
मागील हप्त्यांचा विचार केला, तर सरकार दर चार महिन्यांनी हप्ता जमा करते. योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित झाला. त्यानुसार, 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पण लवकरच याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
ई-केवायसी का महत्त्वाची?
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. यासाठी pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन ‘e-KYC’ या पर्यायावर क्लिक करून आधार व मोबाइल क्रमांक टाकावा लागतो. ओटीपीच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण होते. ज्यांना ऑनलाइन करता येत नसेल, त्यांनी जवळच्या CSC केंद्रात जाऊन ही प्रक्रिया करावी. कारण सरकारने स्पष्ट केलंय – ई-केवायसीशिवाय हप्ता रोखला जाऊ शकतो!
भारताच्या ग्रामीण जीवनाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना अनेकदा शेतीतून फारसा नफा मिळत नाही. यामुळे 2019 मध्ये केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली. दरवर्षी 6,000 रुपये तीन समान हप्त्यांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतात. ही रक्कम फार मोठी वाटणार नाही, पण अनेक लहान शेतकऱ्यांसाठी ती मोठा आधार ठरते.
पात्र कोण? आणि नाव यादीत आहे का हे कसं तपासाल?
सदर योजनेसाठी फक्त तेच शेतकरी पात्र आहेत, ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर शेती आहे आणि जे उच्च उत्पन्न गटात येत नाहीत. सरकारी कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक व आयकर भरणारे योजनेसाठी अपात्र आहेत.
आपलं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन ‘Beneficiary List’ वर क्लिक करा, तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि ‘Get Report’ वर क्लिक करा.
आजही अनेक शेतकरी ई-केवायसी प्रक्रिया आणि पोर्टलविषयी अनभिज्ञ आहेत. काही ठिकाणी इंटरनेट कनेक्शनची मर्यादा आणि तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी वेळेवर होत नाही. शेतकरी संघटनांनी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे की, ग्रामीण भागात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात यावी.
ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे आणि पात्रतेच्या सर्व अटींचं पालन केलं आहे, त्यांच्यासाठी 20वा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने करावी – अन्यथा या वर्षाचा हप्ता हातातून निसटू शकतो!