‘ही मैत्री विचारांची’ या क्लबहाऊस ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहसंमेलन नुकतेच शेरु अग्रो टुरिझम, यवत, ता. दौंड, जि. पुणे येथे पार पडले.
मागील तीन वर्षापासून आवर्जून मी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जातो आहे. दीपक चव्हाण सर यांनी क्लबहाऊसबद्दल माहिती दिली आणि जवळपास ४५०० शेतकरी बांधवांचे आयुष्य बदलून गेले.

शेतकरी सहकार्य ते शेतकरी आत्महत्या रोखण्यापर्यंतचे महत्वपूर्ण काम या समूहाने केले आहे. या स्वयंपूर्ण कुटुंबाचा हा कुटुंबमेळा खूप आनंदाने पार पडला. आदल्या दिवशी स्नेहसंमेलन व कौटुंबिक सोहळा पार पडला.
दुसऱ्या दिवशी शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. विभागीय कृषि सहसंचालक मा. रफिक नायकवडी साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी मार्गदर्शन, शेतकरी सन्मान आणि खुली चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. खुल्या चर्चेत महाराष्ट्रातून आलेल्या शेतकरी बांधवांनी ५० पेक्षा जास्त प्रश्र्न विचारले त्याची उत्तरे क्लबहाऊसच्या माध्यमातून मिळणार आहेत.
एक विशेष पाहुणे मंडळींची टीम म्हणजे ‘इंडियन फार्मर’ यांनी १० जणांच्या टीमसहीत उपस्थिती लावली होती. तंत्रज्ञान आधारित काही मुलाखती त्यांनी घेतल्या. सोबत उत्तम प्रकारे त्यांनी यावर स्टोरी बनवली आहे ती देखील लवकरच प्रकाशित होईल. लोकमत अग्रोचे पत्रकार दत्ता लवांडे यांनी देखील वेगवेगळ्या विषयावर शेतकरी बांधवांच्या मुलाखती घेतल्या.
अग्रोवनचे जेष्ठ पत्रकार मा. अमित गद्रे सर, मॅक्स महाराष्ट्रचे विजय गायकवाड सर, बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण सर आणि इतर मार्गदर्शक मंडळी देखील उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.

‘भारतरथ’ टीमने भविष्यात ONDC ला जोडता येईल असे सेलिंग पोर्टल कम वेबसाईट बनविले आहे. ‘द फार्म’ टीमने कार्यक्रमासाठी अहवाल, प्रेझेंटसन, वेबसाईट कंटेंट आणि कार्यक्रम नियोजनात विशेष सहकार्य केले. विशेष म्हणजे मला आणि आमची बहिण राधिका हिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन करण्याची संधी मिळाली.
कायम कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी हे दोन दिवस पर्वणी होते. दौंडकर मंडळीनी यावर विशेष परिश्रम घेतले त्यांचे ऋण शब्दांत व्यक्त होण्यासारखे नाही.
श्री रितेश पोपळघट
संचालक: द फार्म