सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून, पिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र खरिपातील भाताचे नुकसान होणार असून, ऊसतोडणी यंत्रणेवर परिणाम होणार आहे.
जिल्ह्यात गुरुवारी (ता. ३०) सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. सातारा, फलटण, खटाव काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. सातारा तालुक्यातील काशीळ, वेणेगाव फलटण तालुक्यातील तिरकवाडी, शहर खटाव तालुक्यातील पुसेगाव, मायणी, वडूज परिसरात पाऊस झाला आहे.
फलटण शहर व परिसरातील उपनगरात रात्री आठच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तासानंतर पावसाने उघडीप दिली.
तिरकवाडी परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस झाला. या मॉन्सूनोत्तर पावसाने ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना जीवनदान मिळाले आहे. कांदा पिकाचे थोडे नुकसान झाले आहे. अगोदरच या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे.
यातच हा पाऊस पडल्याने पिकांना थोडा आधार मिळाला आहे. फलटण पूर्व भागातील दुधेबावी, नाईकबोमवाडी, सासकल, सोनवडी, भाडळी या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने बळीराजा थोडा सुखावला आहे.
खटाव तालुक्यातील मायणी परिसरात रात्री साडेआठच्या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या. सखल भागात पाणी साचले. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा या पिकांना पावसाचा फायदा होणार आहे. पुसेगाव परिसरातील शेतकऱ्यांवर सायंकाळी आठ वाजल्याच्या सुमारास वरुणराजाने कृपादृष्टी दाखवत दमदार हजेरी लावली.
या पावसाने ही पिके पुन्हा तरतरीत होणार आहेत. वडूज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे व पावसाने झोडपले. पावसामुळे शहर परिसरातील रस्त्यांवरील खड्डे पाण्याने तुडुंब भरले होते.